Monday, March 14, 2011

नित्यजन्म

     पाऊस चालू असताना ज्या विजा होतात त्या पहायला मला फार आवडतं.होस्टेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या वीजा,सुईई आवाजात वाहणारा वारा, कडकडाट-गडगडाट इ. सर्वच गोष्टी मनसोक्त अनुभ- वताना,अनेक चांगल्या-चांगल्या आणि सुखद आठवणी काढायला छान वाटतं.
      होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून दिसणारा झगमगाट जो आकाशात आसमंतीय पसरलेला असतो, मध्येच आभाळाचे दोन भाग केल्यासारखी चिरत जाणारी निळी-तांबडी वीज, तावदानं थरथरवणारा गडगडगडाट, रात्रीवर अशाकाळी पसरणारी सामसूम, खोलीतला एक एकाकी रुम पार्टनर, आणि हे सारं 'उगे' पाहावं तसं पाहणारा अस्मादिक! पावसाच्या टपटपण्यात जाणवू लागतात झाकिरजींचे हात किंवा आभाळावर वीजांच्या ड्र्मस्टीक्स आणि सूक्ष्मजीवांच्या बलीदानाने निर्माण होणारा मृदगंध...
       हे अनुभवण्याची गरज असते. खिडकीच्या गजांवर पाणीथेंब खोळंबले की मग टपटपणारे अजातबिंदू. वाऱ्याची हलकीच झुळूक येऊन अंगावर येणारे जलकण ते वाऱ्याच्या झोताने चिंब करणारे शींतोडे.
पाऊस असा मग मला हळवा करीत नाही. उदासीन दृष्टीने तो पाहण्यात वेळ निघतो आणि त्यालाही वाटतं कुणीतरी शेतकरी सोडून आपल्याला महत्व देणारं आहे.पथदिपांचा प्रकाश,तसा संपूर्ण शहराचा प्रकाश त्यात ओला होतो. रस्ते पेंगळू लागतात. अरे! पावसातंच झोपायचंय पाखरांना आज. 
पुन्हा एकदा मृदगंध फळफळतो. रात्रीमध्ये दिवस समरसू लागतो. ती फक्त-फक्त रात्र असते. दूर बुद्धाच्या डोंगरावर एक दिवा तेवढा फाकत असतो. रस्ते वाहू लागतात ते पाण्याने!
असा पाऊस चित्रकाराने चित्र पूर्ण केल्यासारखा एकसारखा कोसळू लागतो.ऊन्हाळयातला पहिला पाऊस. हल्ली लवकर येतो. माझ्यातलं मुल जागं करतो.तो आता पडू लागलाय. अशात मला कॉफी-चहाचा मग हवासा नाही वाटत किंवा कुणाचीतरी सोबत वगैरे.आपण आपलीच किती मोठी सोबत असतो नाही का? सुधीर मोघे त्यांच्या आधार कवितेत म्हणतात तसं-

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो, तो खरोखर आधार असतो का? 
....
अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?




असो विषय भलतीकडे नको वळू देत,.
कदाचित पाऊस त्यासाठीच येत/आला असावातरीसुद्धा. भर ऊन्हानंतर... मारवा संध्याकाळी ऐकावा. तसा पावसाचा मल्हार असा रात्रीच्या जन्मावर अनुभवावा.
गुडुप पांघरुणात पावसाची आठवण...
तो पडतोय. त्याला कळतं माझ्या मनातलं... तो चिरकाल आहे.माझ्यासारखाच...
...बहूत काय?


0 comments:

Post a Comment